शालेय शिक्षणात पहिल्या इयत्तेत आम्हाला एक कविता होती.
“देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश देव देतो
सुंदर हा सूर्य☀️, चंद्रही सुंदर
सुंदर चांदणे पडे त्याचे ”
हे सुंदर आकाश देवाचे आहे. या आकाशातला चंद्र, सूर्य चांदणेही मग देवानेच निर्माण केले आहे. असा सुंदर समर्पित भाव व्यक्त करणारी ही कविता. ही कविता चार-पाच वर्षांच्या कोवळ्या मुलांच्या मनात जसे निसर्गाबद्दल आकर्षण, कुतुहूल निर्माण करते त्याचप्रमाणे विशाल सृष्टीतील सुंदर गोष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्वराबद्दल श्रद्धा जागवते. खरेतर या कवितेत आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. पण कोणी अतिरेकी बुद्धिवादी असेही म्हणू शकतोकी या अशा रचनेमुळे मुले आपल्या कर्तृत्व बुद्धीला नाकारतील. अंधश्रद्ध बनतील. खरेतर असे भीती बाळगण्याचे कारणच काय?
कोवळ्या वयातल्या मुलांना जर आपण पढवू लागलोकी हे जग अनादी अनंत आहे., ते कोणीही निर्माण केले नाही. आपला आत्मा वेगळा असतो आणि शरीर वेगळे असते. तप:साधना करून आपणही परमेश्वर बनू शकतो. तर काय होईल?
खरेतर हे तत्त्वज्ञानही आपल्या ठिकाणी योग्यच आहे. पण ते ग्रहण करण्याचेही एक वय असते. त्याचप्रमाणे आकाश, सौरमाला, ग्रह, तारे, प्रकाशकिरणांचा वेग, ढग कसे बनतात? पाणी हे एक संयुग आहे…हे समजण्याचेही एक वय असते. आणि हे समजावून देण्याघेण्याचेसुद्धा एक वय असते. काही मुले लहान वयातच जास्त चिकित्सक, गंभीरपणे विचार करणारीही असू शकतात. पण तो अपवादही असू शकतो.
सर्वसामान्यपणे या वयातली मुले कल्पनासृष्टीत रमणारी, असतात. मनाला कल्पनेचे पंख लावू रमणीय काव्यसृष्टीत विहरणारी असतात.
मुले हळूहळू मोठी व्हायला लागतात. एक एक इयत्ता वर वर जाऊ लागतात. आपापल्या स्वभावाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे कुटुंबियांचे , आजूबाजूच्या परिसराचे त्यातल्या माणसांचे निरीक्षण करायला लागतात. त्यानुसार त्या विशिष्ट परिसराचे, त्यात घडणाऱ्या घटनांचे, जीव सृष्टीचे ज्ञान त्यांना हळूहळू होत जाते. पुढे वाढत्या वयानुसार सृष्टीतल्या छोट्या मोठ्या गोष्टींमागची रहस्ये त्यांना कळू लागतात. त्यानुसार ज्या विषयात रुची असेल त्याप्रमाणे व्यक्ती त्यात जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करते. त्यात करियर जरी करता आले नाही तरी वेगवेगळे छंद जोपासून त्यात आनंद मिळवण्याचा प्रयत्न करते.
किशोर आणि कुमार गटातून युवक किंवा युवती गटात जाताना मुलामुलींमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक स्थित्यंतरे होत असतात. कोणाला जीवशास्त्रात, तर कोणाला रसायनशास्त्रात, तर आणखी कोणास खगोलशास्त्रातही रस वाटू लागतो. कोणाला वकिली डावपेच आवडू लागतात, तर कोणास मानसशास्त्राचा अभयास करावा वाटतो. कोणी छान छान कविता लिहिण्यात रमायला लागतो.
कोणाकोणाला मी कोण? मी कोठून आलो? पुढे मी कुठे जाणार? या सृष्टीतल्या माझ्या अस्तित्वाचा नेमका अर्थ काय? असेही प्रश्न पडायला लागतात. मग त्यासाठी कोणी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो तर कोणी वेगवेगळ्या धर्मग्रंथात याची उत्तरे शोधू लागतो.
वय वर्षे १३ ते १९ हा काळ इंग्रजीत टीन एज म्ह्णून ओळखला जातो. बालकांचे मानसशास्त्र जसे वेगळे असते तसे टीन एजर्सचे मानसशास्त्रही वेगळे असते. बालकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कोणी आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न करतो. कधी त्या प्रश्नांचे खूप कौतुकही होते. पण टीन एजर्सचे प्रश्न याहून वेगळे असतात. या प्रश्नांची उत्तरे त्यांची त्यांनाच शोधायची असतात. फक्त त्यात आपण त्यांना मार्गदर्शन तेवढे करू शकतो… तेही त्यांची इच्छा असेल तरच !
‘प्रश्नचिन्ह’ या कथेचा नायक म्हणजे एक टीन एजर आहे. त्याच्या घरात विशेषतः त्याची आई त्याला समजून घेणारी आहे. त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे आहेत आणि आई नव्या जुन्याचा मध्य साधणारी आहे. एका संस्कारसंपन्न, त्यागी मुनींच्या घराण्याचा वारसा सांगणाऱ्या जैन धर्मीय कुटुंबातील हा युवक सुसंस्कारी, गंभीर व विचारीही आहे. पण त्याला देवाधर्माची अजिबात ओढ नाही. आपल्या जैनत्वाचा गाजावाजा करावा असे त्याला वाटत नाही.
लहानपणी एकदा आठदहा वर्षाच्याअजाण वयात बरोबरीच्या चुलत भावंडांच्या नादाने त्याने एक नेम घेतला होता. रात्री जेवायचं नाही.. संध्याकाळी सहानंतर खरकटं काही खायचं नाही. नियम मोडला तर मोठंच पाप ! फार वाईट घडणार… गुपचूप कोणालाही न सांगता घेतलेला हा नेम त्याने निष्ठेने कसोशीने पाळला आहे. पण कधीतरी संध्याकाळ उलटून गेल्यावर त्याने काहीतरी खाल्ले आहे… आणि मग तो कमालीचा बेचैन झाला आहे. डोळे मिटून धडधडत्या काळजाने तो देवघरात जाऊन बसला आहे. नकळत घडलेल्या या पापाची(?) टोचणी त्याच्या बालमनाला बरेच दिवस पुरली आहे.
आता या वयात ती भाबडी भक्तिभावना त्याच्या मनात उरलेली नाही, आहे ती फक्त दूरस्थ अलिप्तता.
तो एकत्र कुटुंबात राहणारा आहे. आजी-आजोबा, काका-काकी, चुलत भावंडे, भाबी अश्या बऱ्याच जणांचं ते कुटुंब आहे. त्यामुळे वेगवेगळया वयाचे, स्वभावाचे, कित्येक नमुने या मुलाने आपल्या घरातच पाहिले आहेत.
गावात पाचसहा जैन मंदिरे आहेत. त्याअर्थी गावातला जैन समाजही मोठा आहे. त्यामुळे महावीर जयंती, दिवाळीतला निर्वाण महोत्सव, पर्यूषण पर्व, चातुर्मासातील धार्मिक विधी-विधाने, पंचकल्याणिक पूजा, त्यांचा गाजावाजा, बोली-चढावे, झान्जपथक आणि ढोल ताशांच्या आवाजात निघणाऱ्या मिरवणुका, अहिंसा परमो धर्मकी जय च्या घोषणा, गर्दी गोंगाट आणि गदारोळात चालणाऱ्या पूजा,, अभिषेक, अष्टके, हे सारे त्याने बालपणापासून पाहिले आहे.
पण या असल्या पूजा विधानात त्याला काडीचा रस नाही. असल्या मिरवणुकीत त्याला सामील व्हावेसे वाटत नाही. या मिरवणुकीत अग्रभागी असणारी कितीतरी माणसे इतरत्र किंवा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात किती दांभिकपणे वाहतात, किती दिखाऊपणा करतात हे त्याला कोणी सांगण्याची गरज नाही.
मिरवणुकीतले हत्तीवरच्या अंबारीतून मिरवणारे सोनेरी मुगुटातले इंद्र-इंद्राणी, उन्हाने काळवंडलेले, घामेजलेले त्यांचे चेहरे पाहून त्याला कसेसेच का होते? मंदिरात निर्वाणाच्या दिवशी प्रत्येकाने मांडलेल्या वेगवेगळ्या पूजा, कंटाळवाण्या बेसूर आवाजात म्हटली जाणारी अष्टके, कोलाहल, गदारोळ, सातत्याने वाजणारं झान्गट, ते अनाकलनीय शब्द हे सर्व पाहून, ऐकून त्याचं मस्तक बधीर का होतं? त्याच्या पायांना सूक्ष्म थरथर का जाणवते? त्याला तेथून पळून जावंसं का वाटतं?
…. हे सारे प्रश्न आणि त्यापुढची प्रश्नचिन्हे त्या विशिष्ट वयातल्या संवेदनशील किंवा कोणत्याही वयाच्या संवेदनशील व्यक्तीला भेडसावतच असतात. मग तेथे धर्म कोणताहो असो ! तो कोलाहल, गदारोळ… रामनवमीच्या किंवा गोकुळ अष्टमीच्या उत्सवातील असो किंवा आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनाच्या वेळेचा असो … कोणत्याही संवेदनशील माणसाला हे प्रश्न पडल्याशिवाय रहात नाहीत.
आपण पुस्तकात किंवा ग्रंथात वाचलेला रामजन्माचा उत्सव, पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीने प्रसन्न होऊन विटेवर उभा ठाकलेला विठ्ठल, तीर्थंकर बाळाला मेरू पर्वतावर नेऊन क्षीरोदधीने मंगल स्नान घालणारे इंद्र-इंद्राणी खुप वेगळे असतात. प्रत्यक्षातही ते अगदी तसेच किंवा आपण मनात रंगवलेल्या कल्पना चित्राप्रमाणे असावेत असे आपण कधीही म्हणणार नाही पण त्याचा निदान काळाप्रमाणे थोडातरी ताळमेळ घालता यायला हवा असे कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला वाटल्याशिवाय राहत नाही. पण इतर कोणतीही व्यक्ती आणि कथाकार किंवा कलावंत हा शास्त्री पंडित किंवा शास्त्रज्ञ यांच्यापेक्षा वेगळा असतो.
शास्त्रज्ञ मुळाशी जाऊन सत्य शोधण्यासाठी विज्ञानाच्या आधारे प्रयोग करतात. शास्त्री पंडित शास्त्रातील वचने समजावून देतात, मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचे समजावणे, मनावर बिंबवणे कलावंताच्या कलाकृतीपेक्षा खूप वेगळे असते.
कलावंताची कलाकृती ही खरेतर नीतिबोध द्यावा या उद्दिष्टाने निर्माण झालेलीच नसते. तिने फक्त रसिकांच्या बुद्धीत प्रवेश करून चालत नाही तर कल्पनेच्या द्वारे तिने हृदयस्थ भावनांना हात घालून आपल्याला विचारप्रवृत्त केलेले असते. कलाकृतीच्या आधारे जे मनावर बिंबले जाते त्याची जात खूप वेगळी असते.
समजा एखाद्या आर्थिकदृष्टया गरीब गवयाचे एक तुकडाभर शेत आहे. हे शेत दुष्काळी भागात आहे जेथे पाऊस बेभरवशाचा आहे. त्या गवयाला पोटापाण्यासाठी त्या शेतातल्या पिकावरच अवलंबून राहावे लागते. मग उत्तम असा मेघमल्हार गाऊन त्याला कोणी तुझ्या शेतात पाऊस घे म्हणले तर ती त्याच्या कलेची घोर विटंबना नाही काय… एखादा बडा जमीनदार प्रकल्प वर्षेच्या वैज्ञानिक प्रयोगाने पाऊस पडून घेऊ शकतो.. कारण त्यासाठी त्याच्याकडे पैसा असतो, पाईपलाईन करून एखादा शेतकरी नदीचे पाणी शेतात आणून शेत पिकवू शकतो. त्यासाठी त्याचे संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असावे लागतात.
पण गरीब गवई काय करणार… शेतात मैफल भरवून त्याच्यासारख्याच गरीब शेतकऱ्यांच्या पुढे तो जेव्हा एकतानतेने मेघमल्हार गाऊ लागतो तेव्हा त्याचा शेतीभातीला पाणी पुरवठा करण्याचा उद्देश नसतो. त्याचे गाणे ऐकताना रसिक श्रोत्यांच्या मनात ज्या अनाम भावभावनांचे मेघ दाटून येतात आणि त्यामुळे त्यांचे डोळे ही जेव्हा बरसायला लागतात तेव्हा गरीब गवयाला जो अपूर्व आनंद लाभतो तो वेगळ्या पातळीवरचा असतो. पण तो आनंद पोटाची भूक भागवू शकत नाही.
त्याचप्रमाणे एखादी कविता, कथासुद्धा गरीब गवयाच्या गीत गायनाप्रमाणेच ऐकताना किंवा वाचताना रसिकाच्या डोळ्यातून हृदयात प्रवेश करते. त्याच्या अंतरात काहीतरी उमटवते. तसे काहीतरी उमटवावे असा कवीचा किंवा लेखकाचा हेतू कदाचित ती लिहिताना नसतो. तो ती उस्फुर्तपणेही लिहीत असतो.पण ती कलाकृती रसिकाला आनंद देणारी असते. अर्थात त्या कलाकृतीद्वारे आनंद घ्यायचा की कुतर्क करून स्वतःच्या व दुसऱ्याच्या डोक्यालाही ताप द्यायचा हे त्या श्रोत्यांच्या किंवा वाचकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते.
प्रश्नचिन्ह या कथेतूनही वाचता वाचता असेच सुंदर भावतरंग अंतरात उमटत जातात. त्यातल्या नायकाला पडणाऱ्या प्रश्नाचे तरंग आपल्याही मनात खळबळ माजवतात.
प्रश्नचिन्ह या कथेतले गाव आपणही कधीतरी कुठेतरी पाहिलेलेच असते. गावातल्या मंदिरात यांत्रिकपणे होणाऱ्या पूजा आपणही पाहिलेल्या असतात. झाडाझुडपांच्या गर्दीत वसलेली राम, कृष्ण, विठ्ठल, दुर्गामाता, या मंदि%A
2 responses to “प्रश्नचिन्ह (कथा) आस्वादात्मक समीक्षा – PRASHNACHINHA”
Khupch chan
Thank you