मुग्ध निरागस मधुर भावना, कळली नाही कळीस कारे?
निघून गेला शीळ घालुनी, अवखळ चंचल तो वारारे!
भावगीत ते कळले नाही, म्हणून झुरते झुळूक आता;
गंध प्राशुनी आज तयातिल, बनली आहे ती कवितारे!
नकोच होऊ तू परमेश्वर, देवघरातिल पुतळा बनण्या;
माझ्यासम तू मानव हो रे, माझ्यासंगे फुलावयारे!
पुरे परीक्षा या मातीची, पाणीसुद्धा रंग बदलते;
तुझी कसोटी तुला लावुनी, मम नेत्री तू पहा जरा रे!
जरी पुराणे सत्य भासती, धूळ तयावर गतकाळाची;
हळू फुंक तू बनून डोळस, जाणशील मग अध्यात्मारे!
जरी ‘सुनेत्रा’ म्हणती सारे, दृष्टी तैशी आहे का रे?
तूच सांग मज उत्तर याचे, कशी पारखू मी जगतारे?