शुद्ध चांदीच्या निरांजनी या
शुद्ध तुपासह वात तेवते;
कारण आजी कापूस पिंजुन
वळून वाती जपुन ठेवते.
गाळुन जल हे आजोबांना
नात गोमटी आणून देते,
अभिषेकाने प्रभूची प्रतिमा
कषाय मनीचे अपुल्या नेते.
गुलाब, चंपक, जुई, मोगरा
परडीमध्ये फुले जमवितो,
खट्याळ नातू सर्वांआधी
आईसाठी फुले निवडतो.
आजी गाते भजन आरती
बाळांसाठी अन अंगाई,
बाबा रचती कवने गीते
फुलून येते आंबेराई!